Maharashtra Weather: राज्यात पुढील चार दिवस थंडीची काय स्थिती राहणार? या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात २५ नोव्हेंबरनंतरही (Maharashtra Weather) पुढील चार दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी २ अंशाने घसरण होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्र गारठले
दरम्यान उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra Weather) थंडीचा कडाका वाढला असून किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसने घसरण झाली आहे. राज्यात रविवारी (दि.२४) धुळ्यात १० अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. तर नाशिक जिल्ह्यातील थंडीचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या निफाडला पारा ११.८ होता. याशिवाय नाशिक शहरात १३ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ अंशापर्यंत घसरला होता.

उत्तर भारतातील दिल्ली, यूपी, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. तर अनेक राज्यात थंडी आणि धुक्याचे साम्राज्य आहे.

या ठिकाणी पावसाचा अलर्ट (Rain alert)
देशातील जम्मू कश्मीरसह डोंगराळ भागातील राज्यांमध्येही बर्फवृष्टी होत आहे. ज्याचा परिणाम मैदानी भागातही होणार आहे. बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातील तापमानात घसरण सुरू झाली आहे. ही परिस्थिती पाहता, भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक कडक असेल. यासोबतच दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचीही शक्यता आहे. तमिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, केरळ, आंध्र किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *