
soybean bajarbhav :सोयाबीनची राज्यात हमीभावाने सुमारे ३ लाख टनाच्यावर खरेदी झाल्याचा डंका पिटला जात असला, तरी प्रत्यक्षात सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट महाराष्ट्रासाठी सुमारे १२ लाख टनांचे होते. मात्र अनेक कारणांमुळे ती खरेदी होऊ शकली नाही, हेच कारण आहे की आज बाजारातील सोयाबीनचे बाजारभावही पडलेले दिसून येत आहे.
हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात अनेक अडचणी येत असून नाव नोंदणीसाठी राज्य सरकारने १२ जानेवारीपर्यंत मुदत वाढवली असली, तरी प्रत्यक्षात फेडरेशनकडे नवीन बारदान घेण्यासाठी पैसे नसल्याने सोयाबीन खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक कशी करायची हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. हेच कारण आहे की मराठवाड्यातील अनेक हमीभाव खरेदी केंद्र बंद आहेत.
वखार महामंडळाच्याही जाचक अटी असून त्यांना नवीन बारदानामध्येच सोयाबीन हवे आहे. जुने बारदान असेल, तो सोयाबीन नाकारला जात आहे, त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांसह शेतकऱ्यांवर सोयाबीन परत घेण्याची नामुष्की येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर ही सोयाबीन खरेदी आणखी वाढली असती, तर खुल्या बाजारातही सध्या ४ हजार ते ४२०० रुपये सरासरी मिळणारे प्रति क्विंटलचे दर वाढले असते, असे शेतकऱ्यांचे आणि जाणकारांचे म्हणरे आहे.