स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोळी येथील पुलावर तब्बल आठ तास केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर ऊस दराची कोंडी फुटली.गेल्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपये पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्याने प्रति टन 50 रुपये तर, ज्या साखर कारखाने २९०० रुपये दर दिलेल्या कारखान्यांकडून शंभर रुपये दुसरा हप्ता दिला जाणार आहे.
तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रति टन ऊसाला 3100 पहिला हप्ता देण्याच्या मुद्द्यावर ऊस दराची कोंडी फुटली आहे. चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा माझी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
गेल्या वर्षीच्या उसासाठी प्रति टन 100 व पन्नास रुपये देण्यासाठी सर्व साखर कारखान्यांचे सहमती पत्र घेतले जाणार आहे. जोपर्यंत सर्व कारखाने सहमतीचे पत्र देत नाहीत तोपर्यंत साखर कारखाने सुरू करून दिले जाणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.
गळीत हंगामातील प्रति टन उसाचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता तसेच यावर्षीच्या प्रति टन ऊसाला तीन हजार पाचशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर चक्काजाम आंदोलनानंतर १००/५०च्या फॉर्म्युल्यानंतर मागे घेण्यात आले.
दिवसभरातील चक्काजाम आंदोलनानंतर सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
या बैठकीतील निर्णय श्री शेट्टी यांनी आंदोलनस्थळी जाहीर केला. ते म्हणाले की साखर कारखान्यांनी जो तोडगा काढला आहे. त्याला सहमती असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे .जोपर्यंत कारखान्यांकडून पत्र दिले जात नाही. तोपर्यंत कारखाने सुरू करून दिले जाणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. यावेळी, संघटनेचे राज्य अध्यक्ष जालिंदर पाटील जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.