दुष्काळामुळे मक्यासह इतर धान्याचे घटलेले उत्पादन इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठी चा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदललेले आहे . देशभरातील बाजारात आता मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत . पुढील काळात मग त्याचा उठाव आणखीन वाढवून भावही सुधारू शकतात अशी स्थिती सध्या आहे.
मक्याच्या भावात ऑक्टोंबर पासून 20% ने वाढ झाली असून देशातील मक्याचे भाव पाहिले तर 2200 ते २४०० रुपये यांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील भाव पातळी २१०० ते २३०० रुपये यांच्या दरम्यान असून केंद्र सरकारने यंदा मक्याला 2090 हमीभाव जाहीर केलेला आहे.
खरिपातील नवा माल बाजारात आला त्यावेळी असलेला भाव आणि आत्ताचा भाव यात जवळपास 300 ते 400 रुपयांचा फरक दिसतो. खरिपातील घटलेले उत्पादन सरकारने हमीभावाने खरेदीचा घेतलेला निर्णय आणि तेल कंपन्यांनी मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या दरात केलेली वाढ यामुळे बाजारातील समीकरण बदललेले आहे.
पोल्ट्रीकडून चांगला उठाव..
पशुखाद्य उद्योग हा मक्याचे मुख्य ग्राहक आहे. पोल्ट्रीमध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या अंड्याचे भाव शेकडा 550 ते ६५० रुपयांच्या दरम्यान आहेत. पोल्ट्री चे भावही 80 ते 85 रुपये यांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाकडून मक्याला चांगलाच उठावही आहे.
सध्या इतर धान्य मिळण्यात पोल्ट्रीला अडचण येत असून, त्यातच इतर धान्याची भाव जास्त आहेत. याचाच फायदा मका या पिकाला होत आहे.सध्या सोयापेंड स्वस्त दिसते, पण पुढील काळात सोयापेंडचे भाव वाढू शकतात यामुळे मक्याचा वापर वाढू शकतो. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
इथेनॉल साठी मक्याचा पर्याय..
इथेनॉल साठी मक्याला मागणी वाढत आहे.यंदा देशातील ऊस उत्पादन घटल्याने साखर निर्मितीवर परिणाम झाला. त्यामुळे सरकारने थेट उसाच्या रसापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली त्यामुळे इथेनॉल उद्योगाचा भर धान्यापासून इथेनॉल निर्मितीवर आहे.
यंदा इथेनॉलसाठी गहू ,तांदूळ, ज्वारी ही धान्य पिके उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे इथे नॉल उद्योगाचे भर मक्कावरच आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मिती वाढावी यासाठी तेल कंपन्यांनी लिटर मागे 5.70 रुपयांनी वाढ केली. म्हणजेच मक्यापासून निर्मिती केलेल्या इथेनॉलला 71.80 रुपये भाव मिळणार आहे.
उद्योगांचे लॉबिंग सुरू..
– पशुखाद्य, स्टार्च निर्मिती आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला मागणी
– यंदा दुष्काळ, पावसातील खंडामुळे उत्पादन कमीच
– तांदूळ ,गहू आणि इतर धान्य पिकांचा पुरवठा कमी असून भावही जास्त
– उद्योगांकडे मक्याशिवाय फारसा पर्याय उपलब्ध नाही
– पशुखाद्य, पोल्ट्री उद्योगाकडून मका आयातीची मागणी
– सरकारकडून आयातीच्या मागणीवर विचार नाही












